Sunday 27 September 2015

बाप्पाची आरती...

सुरेश काकांकडला गणपती म्हणजे जणू आमच्या सोसायटीचा मुख्य गणपतीच! दरवर्षी ठरलेली ती ३ फूट उंचीची दगडूशेठ हलवाईची गणपतीची रेखीव, सुबक आणि प्रसन्न मूर्ती. आकाराने आणि दिसायला जरी सारखीच असली तरी बाजूच्या सजावटीमुळे दरवर्षीचा बाप्पा वेगळा - पण तरीही आम्हाला जवळचाच वाटतो.

लहानपणापासून, म्हणजे मी अगदी ६ वर्षाचा असल्यापासून आमच्या सोसायटीत तीन जणांकडे गणपती बसायचे आणि रोजची आरती म्हणजे जणू पर्वणीच! बोंगो, टाळ आणि प्रत्येकाच्या आतून येणार्या त्या आर्त स्वरांनी आरती काय सजायची तुम्हाला सांगतो…कालांतराने तीनाचे दोन गणपती झाले, आम्ही मोठे झालो, प्रत्येकाचे रुटीन बदलले, माणसाच्या आयुष्यातील दगदग वाढली आणि लहानपणापासून आम्हाला भेटणारी 'ती' आरती हळूहळू आमच्यापासून दूर जायला लागली…

आज कित्येक वर्षानी ती आरती पुन्हा नव्याने अनुभवायला मिळाली. ती गर्दी, तो बोंगोचा ठेका आणि त्या लांब लांब स्वरांत म्हणल्या गेलेल्या आरत्या यामुळे अगदी कस प्रसन्न वाटलं. म्हटलं, चला आपल्याकडे नवीन कॅमेरा आहे तेव्हा ह्या क्षणांना साठवून ठेवू आणि अस म्हणत आरतीचे अनेक फोटो काढले; बरेचसे मनासारखेही निघालेही - पण वाटलं फोटो हा फक्त एक नजारा आहे…हे फोटो काढताना त्या प्रत्येक फोटोमागचा तो नाद, ती तरलता, तो आवेश आणि ती प्रेरणा जर टिपता आली तर किती बर होईल नाही?

म्हणजे बघा ना, कॅमेरा एकाच समेवर होणार्या टाळ्यांचा आणि टाळांचा फोटो काढू शकेल - अगदी उत्तमरीत्या, पण त्या शेकडो माणसांमधून निर्माण होणार्या त्या टाळ्यांच्या आवाजाची एकजीवता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
गणपतीच्या आरतीपासून सुरू करत मग शंकराची, देवीची, विठ्ठलाची, ज्ञानेश्वराची, तुकारामांची, दत्ताची आणि सरतेशेवटी दशावताराची आरती होताना त्याचा हातातील तबकासाहीत बाप्पासोबत फोटो येईलही कदाचित, पण त्याची त्याच्या मनातल्या बाप्पासोबातची तल्लीनता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
एरवी प्रत्येकाच रुटीन वेगळ, प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा, प्रोब्लेम्स वेगळे आणि त्या प्रसंगाना सामोरे जायचे मार्गही वेगळे, मग आज सगळ्यांचा एकत्र आरतीसाठी उभे असताना फोटो काढताना वाटलं की ती एकता कदाचित त्या फोटोत जाणवणार नाही…
एखाद गाण अतिशय शांत स्वरापासून सुरू व्हाव आणि उत्तरोत्तर ती मैफील रंगत जाउन त्याचा शेवट एखाद्या उच्च स्वराशी व्हावा की बास हाच सूर शेवटी येउन भिडणार होता काळजाला अस वाटावं आणि त्यानंतरची ती प्रसन्न शांतता…तसच ह्या आरतीच…तेव्हा जाणवलं 'मंत्रपुष्पांजली' चे फोटो येतीलही कदाचित पण ती मनाच्या आतपर्यंत पोहोचलेली प्रसन्नता त्या फोटोत जाणवणार नाही…

एवढे सगळे विचार करून मी परत त्या आरतीत मिसळलो…एकरूप झालो…'त्याच्या' जयघोषात स्वत्व विसरून गेलो. कदाचित बाप्पापण त्याच्या भक्तांच्या सूरांत एवढा रममाण झाला होता की आशिर्वाद देताना त्याच्या उजव्या हाताची बोटे जरा थरथरून त्यातील दुर्वांची जुडी कधी खाली पडली हे त्याच त्यालाही कळल नाही…

…बस तेवढ फक्त त्यावेळी फोटोत 'टिपायच' माझ राहून गेल !


-- अमोल नेरलेकर

No comments:

Post a Comment