Tuesday 1 March 2016

आज्जो...

'अग चल पटकन नाहीतर शाळेची बस निघून जाईल…' एक चिमुरडी खांद्यावरच्या दप्तराच ओझ सांभाळत आपल्या सोबत असणार्या मैत्रिणीला सांगत होती. सकाळची ७ ची वेळ असावी आणि मी सुट्टीवर असल्याने सहज सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो.

पूर्ण दिवसाभरापैकी सकाळची वेळ मला सगळ्यात जास्त आवडते. सगळीकडे कस प्रसन्न वातावरण असत. प्रत्येकजण आवरायच्या गडबडीत असला तरी रात्रभर झालेल्या आरामामुळे अधिक उत्साहित असतो. आमच्या घराच्या मागच्या बाजूला बंगल्यांची रांग आहे. सकाळी प्रत्येकाच अंगण झाडलेल असत, रांगोळी काढलेली असते आणि देवघरात झालेल्या पूजेमुळे अवघ वातावरण मंगलमय झालेलं असत. त्यामुळे सुट्टीवर असताना अगदी पहाटे फिरायला जाण्यापेक्षा साधारण ह्या वेळेला फिरायला जाणे मी जास्त पसंत करतो.

'अग्ग किssत्ती वेळ…चल…' त्या चिमुरडीच्या आवाजाने मी भानावर आलो. विद्यार्थी, कामाला जाणारे सर्व, भाजीवाले-फळवाले, छोटी-मोठी कामी करणारे कामगार व कर्मचारी पैकी प्रत्येकजण आपापल्या घाईत आणि धुंदीत होता आणि त्या सार्यांमध्ये अज्जिबात घाई नसलेले, निवांत आणि त्या घाईला बघणारे तीनच जण तेव्हा तिथे होते - मी, जुई आणि कोपर्यावर कट्ट्यावर बसलेला आजोबांचा ग्रुप.

तिची मैत्रीण खाली आली आणि दोघीन्नी बस थांब्याच्या दिशेने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली. त्याना एरवीपेक्षा बहुतेक आज जास्त उशीर झाला होता आणि बस तेवढ्यातच येण्याची चिन्हे दिसत होती. वयाने साधारण ७ ते ८ वर्षांच्या, खांद्यावर आपल्या वजनाच्या अर्ध्या वजनाचे दप्तर ओझे सांभाळणार्या आणि बस चुकू नये म्हणून अक्षरश: धावत जाणार्या त्यांच्याकडे बघून मला माझ्या मावशीचे वाक्य आठवले - 'आजकालची मुल ना बाई जन्मापासून नुसती धावत आहेत. जरा उसंत म्हणून नाही ह्यांना…'

समोरून बस येताना दिसली आणि दोघींनी ती पकडण्यासाठी पाळायला सुरुवात केली. काही कळायच्या आत त्यातल्या एकीचा पाय अडकला आणि ती पडली. गुडघ्याला चांगल लागल - थोड रक्त यायला लागल. क्षणात काय झालं ह्या भीतीमुळे आणि झालेल्या वेदनेमुळे ती चिमुरडी जीवाच्या आकांताने रडायला लागली.

समोर बसलेल्या आजोबा कट्ट्याने हे दृश्य पाहिलं आणि त्यातले दोन आजोबा मदतीसाठी पुढे सरसावले. एकांनी तिला जवळ घेतल, तिच्या जखमेवर हलकेच फुंकर मारली तर दुसर्यांनी जवळच असलेल्या दुकानातून कापूस, मलम आणि पट्टी आणली. एकांनी तिला आपल्याजवळच चॉकलेट देऊन तिच मन वळवायचा प्रयत्न केला तर दुसर्यांनी जखम पुसून त्यावर मलमपट्टी केली.

'अस पळत नाही जायचं बाळा, बघ अस लागत मग' आजोबा त्या चिमुरडीला सांगत होते.

'हो आज्जो पण बस निघून गेली की मग शाळेत कस जाणार. शाळा दूर आहे खूप आणि घरीपण कुणी नाही सोडायला. आई-बाबा दोघेही कामावर गेले' चिमुरडी आपली व्यथा सांगत होती.

'हो बाळा, पण मग अस पडून त्यांना काळजी कराला लावायची का? घरातल्या आजी-आज्जोला सांगायचं, ते येतील' आजोबा तिला समजावत होते. त्या एकमेकांना एकमेकांची नावे माहीत नव्हती, कुठे राहतात - काय करतात ते माहीत नव्हते पण त्या आजोबांची कळकळ, तळमळ आणि प्रेम त्या चिमुरडीला त्यांच्या थरथरणार्या हाताच्या स्पर्शातून जाणवत  होते हे मात्र नक्की.

'आज्जो, घरी बाकी कुणी नसत ना. आई-बाबा त्यांच आवरून जातात. माझ आवरण्यासाठी रोज एक मावशी येतात आणि आमच पटापट आवरून आम्हाला बसपर्यंत आणून सोडतात. आज त्याना घाई होती म्हणून त्या इथपर्यंत आल्या नाहीत. बघा ना, आज मला त्यांनी टिकली पण लावली नाही.' ती सांगत होती आणि तेवढ्यात त्यांची बस आली. हे सगळ ऐकताना त्या 'आज्जो'ना खूप वाईट वाटत होत.

'घरी आम्ही दोघी जुळ्या बहिणी, आई आणि बाबा असतो. पनवेलचे आजी-आज्जो कधीतरी येतात. आईला ते आवडत नाही अस ती बाबाला सांगत असते.' चिमुरडी बोलत होती. बस आल्याचे तिच्या लक्षातच नव्हते. त्या दोघी बहिणी आहेत हे ही मला तेव्हा समजले.

'आणि मग दुसरे?' आज्जोन्नी विचारल.

'ते आता खूप दूर गेले - देवाकडे. पण आज्जो तुम्ही या ना आमच्याकडे. आम्हाला खूप छान वाटेल. आम्ही खूप दिवसांत गोष्टी ऐकल्या नाहीत. याल ना तुम्ही? तुम्ही मोठे आज्जो आणि तुम्ही छोटे आज्जो' त्या दोन आजोबांकडे बघून ती बोलत होती.

आजोबांना दोन क्षण काय बोलाव सुचेना.

'येऊ ना बाळा, का नाही? पण रोज आम्हाला फिरायला जायचं असत ना, मग कस येणार?' आजोबा विषय टाळत असले तरी आतून खूप दुखावले गेले होते. 'आपण एक काम करू! तुम्ही त्या कोपर्यावर राहता ना? मग रोज ५ मिनिट लवकर आवरा. आम्ही तुम्हाला गेट पाशी घ्यायला येऊ आणि बसपाशी सोडू. तोवर आपली एक गोष्ट पण होईल. चालेल? '

'होsssss!' दोघी एका सुरात बोलल्या. त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 'Thank you आज्जो. ठरलं तर मग - रोज सकाळी एक गोष्ट सांगणार तुम्ही आम्हाला.'

'हो ठरल मग. पण आत्ता चला बघू. बस आली बघा. पटकन जा नाहीतर शाळेला उशीर होईल आणि बाई ओरडतील.' आजोबा म्हणाले. गोष्ट ऐकायला मिळणार ह्या आनंदाने ती झालेलं दुखण कधीच विसरली. दोन्ही आज्जोन्ना मिठी मारून त्या दोघी बस मध्ये चढल्या. दोघींनी त्यांना 'टाटा' केल. आजोबांनी पण त्याला प्रतिसाद दिला.

बसला खरतर उशीर झाला होता पण ड्रायव्हर काही बोलला नाही. कदाचित त्यालापण त्याच्या 'आज्जोंची' आठवण आली असावी. बस निघाली. आज्जोन्नी मफलर डोळ्याला लावला.


-- अमोल नेरलेकर । २ मार्च २०१६