Friday 30 December 2016

कट्टा

आज ती म्हणाली 'चल कुठेतरी फिरायला जाऊयात की' आणि  बर्याच दिवसांनी आमच्या कट्ट्यावर गेलो; लग्नानंतर पहिल्यांदाच..!

ह्या काट्याचा नेमका पत्ता असा नाही, अक्षांश-रेखांश पण अचूक काढणे कठीण पण आमच्या नात जुळायच्या काळात आम्हाला एकमेकांची रेष अन रेष जाणवून देऊन आमच्या आयुष्यातला अविभाज्य अंश बनलेला हा कट्टा. अगदी सुरुवातीला 'कुठे भेटायचं' असा विचार करता दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून निवडलेला 'कट्टा' आणि आता आवर्जून जाऊन परत 'त्या' क्षणांना अनुभवून पाहण्यासाठी असलेला कट्टा - खरंतर ह्याच सर्व प्रवासाचा समक्ष साक्षीदार असलेला हा कट्टा...!

कट्टा तसा शांत ठिकाणी. फार तर फार अजून ५-७ लोक आजूबाजूला. सकाळी गेलं की सूर्याचं कोवळं ऊन अंगावर लेपत लेपत 'या बसा' म्हणायचा. तेच कधी सूर्यास्ताच्यावेळी गेलं की 'काय मग, आज इथून सूर्यास्त पाहायचाय वाटत' असं म्हणणारा आणि कधी रात्री गेलं की निघताना 'नीट जपून जा हो बाळांनो..रस्त्याला अंधार आहे खूप' असं म्हणून काळजी करणारा हा कट्टा. त्याला मुळात पाहुणचारच खूप आवडत असावा. कधी पक्ष्यांच्या गुंजनातून, कधी वार्याच्या झुळुकीतून तर कधी बासरीच्या सुरांतून त्याने पाहुणचार केल्यावर मन कस तृप्त व्हायचं!!

कट्ट्याने आमची आणि आमच्या नात्याची अनेक रूप पाहिली. आमची पहिली भेट, आमच्यातले कोवळे कोवळे संवाद, एकांतात अनुभवलेले स्पर्श, वाचलेल्या कविता, तिने गजरा माळल्यावर आलेली वाऱ्याची झुळूक, आमचं मौन आणि त्या मौनातूनही होणारा डोळ्यांचा संवाद, आमचा राग, आमची भांडण - ती करून उठून जाणं आणि ती सोडवायला परत तिथेच येणं आणि अशा सार्या गोष्टींना सर्वकाळ साक्षी असलेला हा कट्टा. 

आज बर्याच दिवसांनी पावलं तिथे वळली. गेल्या गेल्याच कट्ट्याने आमचं स्वागत केलं. खरंतर कट्टा तोच, आम्ही माणसंही तीच पण तरीही आजच तिथे जाणं खूप वेगळं वाटलं. आज कट्टा मला घरातल्या कर्त्या पुरुषासारखा वाटला - आपले बाबा किंवा आजोबा असावेत ना तसा! लग्नकार्य पार पडल्यावर दोघांकडल्या वडिलांच्या चेहर्यावर 'समाधान' यावं तस ह्याच्याही चेहर्यावर आलं आणि निघताना सहज मागे वळून 'त्याच्या' अबोल चेहर्याकडे पाहिलं तेव्हा जाणवलं की तो नजरेतून माझ्याशी बोलत होता - 'बाळांनो, सुखी रहा.  नीट जपून जा..रस्त्याला अंधार आहे खूप..'


-- अमोल नेरलेकर 
३० डिसेंबर २०१६ 

Thursday 28 April 2016

सदा'तरुण'

'मी मिस्टर कुलकर्णी. ९०वे वर्ष चालू आहे. तुम्ही मुंबईचे म्हणालात ना. माझा मोठा मुलगा तिथे असतो - नालासोपाराला. तो पण आता ६४ वर्षांचा झाला. मी तिथे गेलो की आम्ही एकाच ज्येष्ठ नागरिक संघात जातो. मज्जा आहे की नाही, द्या टाळी!' अस म्हणत त्यांनी माझ्या हातावर टाळी दिली. मी मित्राच्या लग्नासाठी पुण्याला गेलो असताना वाटेत - 'अहो जरा मला तुमच्या गाडीवरून तिथे कोपर्यापर्यंत सोडता का?' अस प्रतिकात्मकरित्या डाव्या हाताचा अंगठा 'लिफ्ट'साठी  वर करणारे 'तरुण' आजोबा भेटले.

'तुमच नाव काय म्हणालात?'

'अमोल नेरलेकर. मी डोंबिवलीला असतो. आजच्या दिवस इथे आलोय.' मी त्यांना माझा थोडक्यात परिचय करून दिला आणि हातातल्या साध्या ४०० रुपयाच्या घड्याळाकडे पाहून मला किती उशीर होतोय हे उगाच दाखवून दिले.

'तुम्हाला उशीर होतोय का? नाहीतर तुम्हाला एक गम्मत सांगितली असती' त्यांनी मला दिलेला एवढा आदर पाहून माझे मलाच नकोसे झाले आणि मी घड्याळावरून माझ्या पठाणीची बाही सरकवली.

'नाही, बोला ना आजोबा. त्यात उशीर काय. एका लग्नाला निघालोय' मी अगदी औपचारिक प्रतिसाद दिला.

'आजोबा नाही रे. सदानंद कुलकर्णी. मित्र मला 'सद्या' म्हणतात. तुम्हीपण म्हणा. बघा आपण १० मिनिटांत केवढे चांगले मित्र झालो.' आजोबा मिश्किलपणे बोलत होते. 'तुम्हाला बटाटेवडा आवडतो का?'

'हो…'

'चला तिकडचा वडा खाऊया. छान गरमागरम असतो. मग तुम्ही लग्नाला जा आणि मी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात जातो.' आजोबांची ह्या वयातही खाण्यावर असलेली भक्ती आणि आवड बघून आचंबित झालो.

'मी रेल्वेमध्ये होतो. ४० वर्षे नोकरी केली, आता निवृत्त होऊनही ३० वर्षे होत आली.' अस म्हणत त्यांनी टाळी देण्यासाठी हात पुढे केला आणि टाळी दिली 'अस्सं…!' ह्या एवढ्या उतारवयातही असणारा त्यांचा उत्साह आणि उर्जा वाखाणण्यासारखी होती.

'आजोबा तुम्ही अज्जिबात वाटत नाही हो ९० वर्षांचे! मला तर तुम्ही ७०चे वाटलेलात.' अस बोलल्यावर त्यांना 'सद्या' म्हणून न बोलावल्याचा राग त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. मला उगाच चुकल्यासारखे वाटले.

'अहो हिच तर खरी गम्मत आहे ना नेरलेकर! मस्त जगायचं, मजेत जगायचं, हसत रहायचं आणि मग अस फिट राहता येत. अजूनही मी सकाळी ५:३० ला उठतो. योगासने आणि प्राणायाम करतो, मग बागेतली फूल गोळा करतो. अंगणात चाफा,प्राजक्त, मोगरा आणि तगरीची झाडे आहेत. भरपूर फूल निघतात. आणि मग दोघांसाठी चहा करून घेतो. आमच्या हिला उशिरा उठायची सवय आहे. चहा नाश्ता झाला की पूजा करतो. पोट भरला की कस स्तोत्रेपण खणखणीत म्हणता येतात. देव जागा होतो मग आमचा. मग सायकलीने जाउन घराजवळची काम करतो. अजूनही ३५ वर्षांपूर्वी घेतलेली हार्मोनिअम रोज वाजवतो. दुपारी आराम आणि वाचन करतो आणि संध्याकाळी ५ ते ७ आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळात जातो. जाताना कधी कधी तुमच्यासारख्या उत्साही तरुणांशी भेट होते. गप्पा होतात. मस्त वाटत.'

मला काय बोलावे सुचेना. त्यांचा उत्साह आमच्यासारख्या तरूणांना लाजवेल आणि आम्हाला अनेक गोष्टी करण्याची प्रेरणा देणारा होता.

'सद्या…अरे चल…५ वाजले.' त्यांना कुणीतरी हाक मारली. कदाचित त्यांच्या संघातील त्यांचे मित्र असावेत.
'आलोच रे गण्या एवढा वडा संपवून आलोच.' त्यांनीही प्रतिसाद दिला.

'हा गणेश जोगळेकर. आमचा मित्र. चला निघतो नाहीतर उशीर होईल. परत भेटूच. आलात पुण्यात की घरी या मी त्या श्री हॉस्पिटल समोरच्या बिल्डींगमध्ये राहतो. तुम्हीपण निघा. मित्राच लग्न म्हणालात ना? मग लवकर जावा आणि मंडपाच्या आजुबाजूला लक्ष द्या. तुम्हाला पण भेटेल तिथे 'एखादी'…नाही का?' अस म्हणत त्यांनी सवयीप्रमाणे मला टाळी दिली.

आजोबा निघून गेले आणि मला उशीर होत आहे हे ही मी दोन क्षण विसरून गेलो. एखाद्याने शरीरासोबत मनानेही ह्या वयात किती तरूण असावे ह्याचे हे उत्तम उदाहरण होते. अशा माणसांशी भेटून आपल्यालाच आणखीन प्रेरणा मिळत असते, हे नक्की!

आजोबांना खरी दाद द्यावीशी वाटली. मी ही थोड्या टाळ्या वाजवल्या. ह्यावेळी दोन्ही हात मात्र माझेच होते!


-- अमोल नेरलेकर । २८ एप्रिल २०१६ 

Tuesday 1 March 2016

आज्जो...

'अग चल पटकन नाहीतर शाळेची बस निघून जाईल…' एक चिमुरडी खांद्यावरच्या दप्तराच ओझ सांभाळत आपल्या सोबत असणार्या मैत्रिणीला सांगत होती. सकाळची ७ ची वेळ असावी आणि मी सुट्टीवर असल्याने सहज सकाळी फिरायला बाहेर पडलो होतो.

पूर्ण दिवसाभरापैकी सकाळची वेळ मला सगळ्यात जास्त आवडते. सगळीकडे कस प्रसन्न वातावरण असत. प्रत्येकजण आवरायच्या गडबडीत असला तरी रात्रभर झालेल्या आरामामुळे अधिक उत्साहित असतो. आमच्या घराच्या मागच्या बाजूला बंगल्यांची रांग आहे. सकाळी प्रत्येकाच अंगण झाडलेल असत, रांगोळी काढलेली असते आणि देवघरात झालेल्या पूजेमुळे अवघ वातावरण मंगलमय झालेलं असत. त्यामुळे सुट्टीवर असताना अगदी पहाटे फिरायला जाण्यापेक्षा साधारण ह्या वेळेला फिरायला जाणे मी जास्त पसंत करतो.

'अग्ग किssत्ती वेळ…चल…' त्या चिमुरडीच्या आवाजाने मी भानावर आलो. विद्यार्थी, कामाला जाणारे सर्व, भाजीवाले-फळवाले, छोटी-मोठी कामी करणारे कामगार व कर्मचारी पैकी प्रत्येकजण आपापल्या घाईत आणि धुंदीत होता आणि त्या सार्यांमध्ये अज्जिबात घाई नसलेले, निवांत आणि त्या घाईला बघणारे तीनच जण तेव्हा तिथे होते - मी, जुई आणि कोपर्यावर कट्ट्यावर बसलेला आजोबांचा ग्रुप.

तिची मैत्रीण खाली आली आणि दोघीन्नी बस थांब्याच्या दिशेने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली. त्याना एरवीपेक्षा बहुतेक आज जास्त उशीर झाला होता आणि बस तेवढ्यातच येण्याची चिन्हे दिसत होती. वयाने साधारण ७ ते ८ वर्षांच्या, खांद्यावर आपल्या वजनाच्या अर्ध्या वजनाचे दप्तर ओझे सांभाळणार्या आणि बस चुकू नये म्हणून अक्षरश: धावत जाणार्या त्यांच्याकडे बघून मला माझ्या मावशीचे वाक्य आठवले - 'आजकालची मुल ना बाई जन्मापासून नुसती धावत आहेत. जरा उसंत म्हणून नाही ह्यांना…'

समोरून बस येताना दिसली आणि दोघींनी ती पकडण्यासाठी पाळायला सुरुवात केली. काही कळायच्या आत त्यातल्या एकीचा पाय अडकला आणि ती पडली. गुडघ्याला चांगल लागल - थोड रक्त यायला लागल. क्षणात काय झालं ह्या भीतीमुळे आणि झालेल्या वेदनेमुळे ती चिमुरडी जीवाच्या आकांताने रडायला लागली.

समोर बसलेल्या आजोबा कट्ट्याने हे दृश्य पाहिलं आणि त्यातले दोन आजोबा मदतीसाठी पुढे सरसावले. एकांनी तिला जवळ घेतल, तिच्या जखमेवर हलकेच फुंकर मारली तर दुसर्यांनी जवळच असलेल्या दुकानातून कापूस, मलम आणि पट्टी आणली. एकांनी तिला आपल्याजवळच चॉकलेट देऊन तिच मन वळवायचा प्रयत्न केला तर दुसर्यांनी जखम पुसून त्यावर मलमपट्टी केली.

'अस पळत नाही जायचं बाळा, बघ अस लागत मग' आजोबा त्या चिमुरडीला सांगत होते.

'हो आज्जो पण बस निघून गेली की मग शाळेत कस जाणार. शाळा दूर आहे खूप आणि घरीपण कुणी नाही सोडायला. आई-बाबा दोघेही कामावर गेले' चिमुरडी आपली व्यथा सांगत होती.

'हो बाळा, पण मग अस पडून त्यांना काळजी कराला लावायची का? घरातल्या आजी-आज्जोला सांगायचं, ते येतील' आजोबा तिला समजावत होते. त्या एकमेकांना एकमेकांची नावे माहीत नव्हती, कुठे राहतात - काय करतात ते माहीत नव्हते पण त्या आजोबांची कळकळ, तळमळ आणि प्रेम त्या चिमुरडीला त्यांच्या थरथरणार्या हाताच्या स्पर्शातून जाणवत  होते हे मात्र नक्की.

'आज्जो, घरी बाकी कुणी नसत ना. आई-बाबा त्यांच आवरून जातात. माझ आवरण्यासाठी रोज एक मावशी येतात आणि आमच पटापट आवरून आम्हाला बसपर्यंत आणून सोडतात. आज त्याना घाई होती म्हणून त्या इथपर्यंत आल्या नाहीत. बघा ना, आज मला त्यांनी टिकली पण लावली नाही.' ती सांगत होती आणि तेवढ्यात त्यांची बस आली. हे सगळ ऐकताना त्या 'आज्जो'ना खूप वाईट वाटत होत.

'घरी आम्ही दोघी जुळ्या बहिणी, आई आणि बाबा असतो. पनवेलचे आजी-आज्जो कधीतरी येतात. आईला ते आवडत नाही अस ती बाबाला सांगत असते.' चिमुरडी बोलत होती. बस आल्याचे तिच्या लक्षातच नव्हते. त्या दोघी बहिणी आहेत हे ही मला तेव्हा समजले.

'आणि मग दुसरे?' आज्जोन्नी विचारल.

'ते आता खूप दूर गेले - देवाकडे. पण आज्जो तुम्ही या ना आमच्याकडे. आम्हाला खूप छान वाटेल. आम्ही खूप दिवसांत गोष्टी ऐकल्या नाहीत. याल ना तुम्ही? तुम्ही मोठे आज्जो आणि तुम्ही छोटे आज्जो' त्या दोन आजोबांकडे बघून ती बोलत होती.

आजोबांना दोन क्षण काय बोलाव सुचेना.

'येऊ ना बाळा, का नाही? पण रोज आम्हाला फिरायला जायचं असत ना, मग कस येणार?' आजोबा विषय टाळत असले तरी आतून खूप दुखावले गेले होते. 'आपण एक काम करू! तुम्ही त्या कोपर्यावर राहता ना? मग रोज ५ मिनिट लवकर आवरा. आम्ही तुम्हाला गेट पाशी घ्यायला येऊ आणि बसपाशी सोडू. तोवर आपली एक गोष्ट पण होईल. चालेल? '

'होsssss!' दोघी एका सुरात बोलल्या. त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 'Thank you आज्जो. ठरलं तर मग - रोज सकाळी एक गोष्ट सांगणार तुम्ही आम्हाला.'

'हो ठरल मग. पण आत्ता चला बघू. बस आली बघा. पटकन जा नाहीतर शाळेला उशीर होईल आणि बाई ओरडतील.' आजोबा म्हणाले. गोष्ट ऐकायला मिळणार ह्या आनंदाने ती झालेलं दुखण कधीच विसरली. दोन्ही आज्जोन्ना मिठी मारून त्या दोघी बस मध्ये चढल्या. दोघींनी त्यांना 'टाटा' केल. आजोबांनी पण त्याला प्रतिसाद दिला.

बसला खरतर उशीर झाला होता पण ड्रायव्हर काही बोलला नाही. कदाचित त्यालापण त्याच्या 'आज्जोंची' आठवण आली असावी. बस निघाली. आज्जोन्नी मफलर डोळ्याला लावला.


-- अमोल नेरलेकर । २ मार्च २०१६

Thursday 25 February 2016

क्षण…

कोण आज नव्यानी तुझ्या भुलला दारी ?
आज कोणता नवीन खेळ रंगला दारी ?    

शब्दांनी खरे तर पूर्वी अंगण भरले होते,        
का असा मौनाचा वसंत फुलवला दारी?  

मी येण्याची तेव्हा चाहूल तुला गे आली,
सांज कंदीलाचा का दीप विझवला दारी?                    

आता असे करूया अन आता तसे करूया
संवाद स्वप्नाचा तेव्हा, किती चालला दारी!                    

वेशीवरी आली माझ्या येण्याची वार्ता,
न्हाऊन स्वत:ला तू सण सजवला दारी..!

समोर येता माझ्या, फुलल्या कळ्या त्या अनंत,
अधीर झालीस तू ही, 'तो' क्षण थांबला दारी…


--  अमोल नेरलेकर 

Wednesday 17 February 2016

चिमूट

मित्राला फोन करायचा म्हणून मी सीटवरून उठून बाहेर आलो. रिसेप्शनपाशी बसलेल्या रमेशने खुणेनेच मला 'हाय' केले. मी बाहेर आलो.

तसा मी ह्या कंपनीमध्ये नवीनच आणि त्यामुळे गेल्या १५-२० दिवसांत झालेल्या ओळखीही मर्यादित ! पण पहिल्याचदिवशी झालेली पहिलीच ओळख म्हणजे 'रमेश'ची. रमेश आमच्याइथे उपहारगृह सांभाळणारा कारकून. साधारण माझ्याच वयाचा असलेला, उंचीने बुटका, थोडासा सावळा, जीभेवर विदर्भाची मराठी असलेला आणि ऑफिसपासून जवळच आपल्या बायको आणि वर्षभराच्या मुलासोबत राहणारा रमेश माझ्याशी चहा, कॉफी, ऑफिस, ए.सी पासून चिकन, पाणीकपात आणि सरकार अशा अनेक विषयांपर्यंत माझ्याशी गप्पा मारत असे.

माझा बाहेर फोन चालू असताना रमेश बाजूला येउन उभा राहिला आणि माझा फोन संपण्याची वाट पाहू लागला. मला वाटले त्याला नेहमीप्रमाणेच माझ्याशी काहीतरी बोलायचे असेल आणि म्हणूनच थोडके बोलून मी फोन ठेवला.

"बोल रे, काय झाल? आज काय विशेष?" मी रमेशला विचारल. त्याने आपली तंबाखूची पुडी आणि चुन्याची डबी काढली.

"काय नाय साहेब. घरमालक आलेला काल परत. भाडे वाढवायचं म्हणतो. इथे पगार नाही वाढत, एक पोर आहे, बायकोची कटकट असतेच मग ह्याला कुठून देणार ज्यादा भाड?" त्याने चुन्यामध्ये तंबाखू चोळत आपली समस्या मांडली. तोच तळहात दाखवत मला म्हणाला, "घेणार का थोडा?"

मी त्याच्याकडे दोन क्षण पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर समस्येचे गांभीर्य स्पष्ट दिसत होते परंतू त्यासाठी काही करायची त्याची तयारी मात्र नव्हती. आयुष्यात आलेल्या नैरश्येचा राग तो तंबाखू मळण्यावर काढत होता.

"अरे रमेश, अस काय करतोस!" मी त्याला शक्य तेवढ्या प्रेमाने समजावू लागलो.
"हा तंबाखू खाउन तुला प्रोब्लेम सुटेल अस वाटत का? आणि शिवाय काय मिळत हे खाउन? क्षणभर समाधानच ना? आपण कशाला अशी व्यसन लावून घ्यायची? ह्यातून तुला फायदा तर काहीच नाही उलट तुझ्या तब्येतीवर ह्याचे उलटे परिणाम होत आहेत. कितीतरी पैसे तुझे ह्यात वाया चालले आहेत. आणि उद्या हाच तंबाखू तुला बराच वेळ, दिवस मिळाला नाही तर अस्वस्थ होशील कारण तुला त्याची चटक लागली असेल आणि असे करत करतच तू त्याच्या व्यसनाच्या विळख्यात ओढला जाशील. वेळीच सावध हो"

रमेश 'सावधान' सारखा उभ राहून माझ सगळ बोलण ऐकत होता. काही उलट बोलला नाही ह्यावरून त्याला माझ थोडतरी पटल असाव असा अंदाज मी बांधला.

"अरे हेच पैसे वाचवून त्यातून मुलासाठी एखादा खाऊ किव्वा खेळण घेऊन जा; बायकोसाठी एखादी भेटवस्तू घेऊन जा. बघ त्यांचे चेहरे हर्षाने कसे फुलून येतील आणि त्यांना तसे पाहून तुलाच किती बर वाटेल. तुझ्या जगण्याला नवीन उमेद येईल आणि मग त्या घरमालकाला बघून तुझा असा त्रागा होणार नाही. आयुष्य खूप सुंदर आहे रे आणि आपल्या लोकांसोबत मिळून-मिसळून जगण्यातच तर खरी मजा आहे. कधीही काही लागल तर हक्काने सांग."

माझ एवढ बोलण होईस्तोवर त्याच्या हातातला तो तंबाखू वाळला होता. रमेशने माझ्याकडे पाहिलं; त्याचे डोळे बरच काही सांगत होते. त्या वाळलेल्या तंबाखूची चिमूट भरून घ्यायच्या ऐवजी त्याने तो तसाच कचरापेटीत टाकला आणि म्हणाला,

"साहेब आत्तापर्यंत बापाने आणि मित्रांनी खूप सांगितलं - तंबाखू सोड पण तुमच्यासारख समजावलं नाही कोणी. प्रत्येकजण ओरडायचा पण विश्वासात घेऊन समजावणारे तुम्हीच. बाप्पाची शपथ साहेब, पुन्हा पुडीला हात लावणार नाही." असे म्हणून त्याने खिशातील पुडी आणि चुन्याची डबी दोन्ही कचरापेटीत टाकून दिले.

" आज जाताना मुलासाठी खाऊ घेऊन जाईन आणि तिच्यासाठी वांगी. भाजी खूप छान करते ती. साहेब, गरम गरम चहा घेणार का?"
मी खुणेनेच होकार दिला. तो चहा बनवण्यासाठी निघून गेला. आपल्या चिमूटभर प्रयत्नांनी त्याची 'चिमूट' सोडवून त्याच्या आयुष्यात फारकाइतुका बदल घडवल्याचे समाधान मला मिळाले.

ह्या क्षणाचा आनंद कोणाला सांगावा मला सुचेना. 'त्या' मित्राचा फोन परत एकदा खणखणला. चहा मस्त झाला होता!


-- अमोल नेरलेकर । १७ फेब्रुवारी २०१६   

Saturday 6 February 2016

जुई...

'म्यांsssव'…मागून हलकाच पण भेदरलेला आवाज आला. मी आणि माझा मित्र नेहमीप्रमाणे शनिवारच्या प्रसन्न सकाळी फोटोग्राफी करण्यासाठी टेकडीवर गेलो होतो. मानवाच्या सहजतेने आणि प्रेमाने जवळ जाणार्या सर्व प्राणी आणि पक्ष्यांविषयी मला आस्था आहे आणि त्यामुळेच कदाचित ज्याप्रमाणे एकदा अस्पष्ट आवाज ऐकल्यावरही मांजराचे कान टवकारले जातात त्याप्रमाणे माझे कान त्या आवाजाच्या दिशेने ओढले गेले.

'म्यांsssव…म्यांsssव' अजून आवाज येतच होता पण पिल्लू नेमके कुठे आहे ते दिसेना. थोडे पुढे जाउन वळसा घेतला तर आमच्या वाटेत बरोबर मधे ते पांढरेशुभ्र पिल्लू बसले होते. आम्ही त्याच्या समोर जाउन बसलो खरे पण भीतीने घाबलेल्या त्याची आमच्या नजरेला नजर मिळवण्याची बहुतेक हिम्मत होत नव्हती. मला आठवतंय, लहानपणी शाळेत रिझल्ट लागला की घराच्यान्सामोर माझी अशीच गत व्हायची.



खर सांगायचं तर जगातले बहुतांश प्राणी हे तुम्हाला वासाने आणि तुम्ही त्याला कसा स्पर्श करता ह्यावरून तुम्हाला ओळखतात. मी त्या पिल्लाला जवळ घेतले; आधी त्याच्या गळ्याखाली आणि नंतर डोके, पाठ आणि संपूर्ण अंगावरून कुरवाळले. कदाचित त्याला माझा हा स्पर्श आवडला असावा आणि म्हणूनच परिणामी त्याच्या पोटातून भीतीपोटी येणारे कंप कमी झाले, स्व-संरक्षणासाठी विस्फ़ारलेली नखे जवळ आली, फुगवलेली शेपटी हळूहळू पूर्वपदावर आली आणि आपल्या पुढील दोन पायांनी माझ्या डाव्या अंगठ्याला मिठी मारून त्याने बोटांना चाटायला सुरुवात केली. पोपटी घारे डोळे, दूरवरचे आवाजही टिपता येता येतील असे मोठे कान, जन्मजातच भाळी असलेला 'कृष्ण-टिळा' आणि शुभ्रवर्ण ह्या साऱ्यांमुळे त्या तळहाताएवढ्या जीवाने माझ्या मनात मोठे घर निर्माण केले.

आजूबाजूला खूप चौकशी करूनही मला ह्या पिल्लाची माय किव्वा भावंडे सापडली नाहीत. त्याउलट, एकटे सोडले असताना तिकडील दोन मांजरे ह्याच्यावर धावून आली. ते पिल्लू परत मला येउन बिलगले. ह्यावेळी मात्र नैसर्गिक आव्हानांमुळे दाटलेली भीती त्याच्या डोळ्यांत, बराच वेळ पाणी न मिळाल्यामुळे लागलेली तहान त्याच्या कोरड्या जीभेतून, काही दिवसांपासून खायला न मिळाल्याने पोटात उगवलेली भूक आणि ह्यासार्यांमुळे आपल्या अवघ्या अस्तित्वावर पडलेले प्रश्नचिन्ह त्याच्याकडे पाहून स्पष्ट दिसत होते; जाणवत होते! हे सारे बघून मी 'त्या' पिल्लाला घरी न्यायचे ठरवले आणि अशाप्रकारे 'जुई'ची आमच्या घरी एन्ट्री झाली.

'जुई' हे माझ खूप आवडत नाव आहे आणि सापडलेल हे पिल्लूदेखील पांढर शुभ्र त्यामुळे 'त्या' नावाला सार्थ ठरेल असच! जुईला घरी आणले तो शनिवार होता आणि त्यामुळे सलग दोन दिवस तिच्याकडे नीट लक्ष द्यायला मला वेळ मिळाला. त्या तळहाताइतक्या जीवाची नक्की कुठून आणि कशी काळजी घ्यायला सुरुवात हा प्रश्न होता. तिच्याकडे बघून तिला काही दिवसांपासून नीट खायला न मिळाल्याचे दिसत होते आणि म्हणून सुरुवातीचे दोन-तीन दिवस तिला चमच्याने दूध पाजावे लागले. हळूहळू ती स्वत:हून दूध प्यायला लागली. पुढील काही दिवस तिला घराचा, खाण्या-पिण्याच्या वेळेचा, उठण्या-झोपण्याच्या वेळेचा, ते मिळणार्या जागेचा आणि शी-सू करण्याच्या जागेचाही अंदाज येण्यात गेले आणि त्यानंतर जुई आमच्या घरात मुक्तपणे वावरू लागली.

सुरुवातीच्या काळात आईच दूध हा खरतर कुठल्याही पिल्लाचा आहार असतो; जुईला मात्र इथे नशिबाने साथ दिली नव्हती. पण तरीही नेरलेकरांकडच्या पोहे, उपमा, शिरा, इडली, मेदू-वडा, कोकम सरबत, पन्हे, पोळ्या, डोसेपासून दही, बासुंदी आणि श्रीखंडापर्यंत जुई बिनधास्त ताव मारत होती आणि तो तो पदार्थ पचेपर्यंत ढाराढूर झोपा काढत होती. मला नक्की आठवत नाही, पण एक-दोन वेळा मी तिला घोरताना पण ऐकले होते.

जुई घरी रुळत चालली होती. परिणामी, तिच्या खायच्या-प्यायच्या वेळा आणि झोपायच्या जागा आम्हाला पाठ होऊ लागल्या. मित्र, नातेवाइक आणि आप्त-इष्टान मध्ये 'जुई' आणि तिचे फोटो, ती काय करतेय हा उत्साही चर्चेचा आणि नित्यनियमाचा विषय होऊ लागला. घरी येणारे किवा फोन करणारे बहुतांशजण 'अमोल कसा आहेस रे?' किवा 'घरी काय म्हणतात सगळे?' ह्यापेक्षाही 'जुई काय करतेय?' असा प्रश्न विचारू लागले आणि जुई लोकप्रिय झाल्याची आम्हाला पावती मिळाली.



जगातल्या प्रत्येक प्राण्याच्या आणि पक्ष्याच्या पिल्लाला जन्मजात मिळणार सौंदर्य आणि गोंडसपणा ह्या बाबतीत मला विधात्याचे खरोखर खूप कौतुक वाटते. ह्या पिल्लांचा गोंडसपणा पाहून प्रत्येकाने त्याच्यावर प्रेम कराव, त्याला जवळ घ्याव, त्याला गोंजाराव अशा भावना मनात येण अगदी साहजिक आणि नैसर्गिक आहे आणि त्यामुळे कुठलाही प्रसंग असो, जुईकडे पाहिलं की क्षणात खूप बर वाटायचं. एकदा असच, माझा आणि बाबांचा किरकोळ वाद झाला असताना कोपर्यातून जुईने डोक वर केलं आणि 'कित्ती आवाज करताय, शांत बसा बघू' अशा भावात आमच्याकडे पाहिलं आणि आमचा वाद क्षणांत मिटला.

मध्यंतरी जुईच्या आजारपणाने डोक वर काढलं आणि काही दिवस आम्ही त्यामुळे चिंतेत होतो. अती गोड खाल्यामुळे तिला जंत झाले होते, परिणामी ती अशक्त झाली होती आणि रोज आमच्या कानी येणार 'म्यांsssव' बंद झाले होते. चांगल्या उपचारानंतर ती नीट बरी झाली आणि नंतर रोजच्या ठरलेल्या वेळात 'मला खायला द्या' अशा अर्थाचा तिचा येणारा तार-सप्तकातला आवाज आम्हाला त्याची प्रचीती द्यायला लागला.

जुई घरात छान रुळली होती आणि आमच्या घरचा आणि आयुष्याचा एक भाग बनली होती. रोज निघताना आणि बाहेरून आल्यावर 'जुई' कुठे आहे हा प्रश्न एकमेकांना विचारला जातो. वजन आणि आकाराने ती चांगलीच वाढली होती. बाकी आहार, झोप आणि फिरणं पण ठरल्याप्रमाणे चालू होत. आठवड्यातून एकदा गरम पाण्याने स्पंजिंग करून लाड होत होते. आता तिलापण आमचा दिनक्रम पाठ झाला होता त्यामुळे सकाळी उठेपर्यंत ती आम्हाला अज्जिबात काही बोलत नाही; सकाळचा नाश्ता झाला की पूर्ण अंग चाटून स्वत:ला साफ करून मस्त झोप काढते. दुपारी आमच्या स्वयंपाक घरात येणार्या उन्हाने अंग शेकून घेते. संध्याकाळी खेळ आणि मस्ती चालूच असते आणि मग रात्री आमच्यासोबत टीव्ही बघते आणि नंतर ठरलेल्या जागी ठरलेल्या शालीवर छान झोपते. तिला आता अमोल कधी जातो आणि कधी येतो हे पाठ झाले आहे; म्हणूनच त्या वेळेला ती दाराजवळ वाट बघत उभी राहते आणि आलो की स्वागत करते. बाबा कधी कुठल्या खोलीत बसतात, आराम करतात आणि वाचत बसतात हे तिला माहीत झाले आहे. सकाळी बाबा पूजा करतात तेव्हा त्यांच्या मागे बसून डोळे मिटून, कान ताठ करून ती सर्व स्तोत्रे आणि पोथ्या ऐकते. देवांची नावे माहिती नसूनही त्या देवांची ती निस्सीम भक्त झाली आहे. स्वयंपाक करायला आणि आम्ही घरी नसलो (बाहेरगावी गेलो असल्यास) की तिला मनापासून सांभाळणार्या सीमा काकूंनाही तिचा लळा लागला आहे आणि जुईलाही त्यांची सवय झाली आहे.



कुणी म्हणत जुईमध्ये तू खूप गुंतला आहेस, कुणी म्हणत सगळ वर्णन ऐकून ती तुझी मुलगी असल्यासारखी वाटते. पण खरच, एवढा काळ कधी निघून गेला ते कळलंच नाही. पुढील आठवड्यात जुईला घरी येउन चार महिने होतील. तळहाताएवढा जीव फूटभर लांबीचा कसा झाला ते कळलच नाही. तिचं आमच्यासोबत असण हा आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे आणि म्हणूनच ती बाहेर गेली किव्वा खूप वेळ डोळ्यांसमोर दिसली नाही तर मनात धस्स होत. अजून कादाचित वर्षभराने ती एवढी मोठी झाली असेल की लाडाने 'चिंगी' म्हणण्याच पण तिच वय निघून गेल असेल. कदाचित तेव्हा तिला सगळे दात आले असतील आणि त्यामुळे कदाचित ती आत्ता एवढी हळूवार चावणार नाही, तेवढी मस्ती करणार नाही. तेव्हा तिचं बाहेर फिरणं वाढल असेल, तिचे मित्र-मैत्रिणी झाल्या असतील आणि तिला मी 'माझ्याजवळ बस ना थोडावेळ' अस म्हणू शकणार नाही. खरच, कधीकधी काळ पुढे सरकूच नये अस वाटत.

अजूनही रात्री झोपायची वेळ झाली की जुई माझ्याजवळ येते. पहिल्यादिवशी जसे कुरवाळले तसे माझ्याकडून गळ्याखाली, मग डोक्यावर आणि नंतर अंगावर कुरवाळून घेते. तिला अंगाई किवा मराठी भाषा कळत नाही पण रात्रीच्यावेळी आमच्या घरी लागणारी भूप, शंकर, कामोद, नंद, केदार आणि चंद्रकंस रागातली गाणी तिला आवडतात. अजूनही तिची झोपायची जागा आणि शाल तीच आहे. तिच्या त्या पोपटी घार्या डोळ्यांत अजूनही आपल्या आईविषयी आणि भावंडांविषयी असणारी आस्था दिसते. ते पाहून मी क्षणभर अस्वस्थ होतो खरा; पण मग तो तळहाताएवढा जीव माझ्या घरी सुखाने नांदत असल्याचे समाधान मला मिळते. ती माझे ते समाधानी डोळे वाचते आणि माझ्या मांडीवर डोक ठेवून खुशाल झोपी जाते. मी पुढील बराच वेळ तिला तसच थोपटत बसतो..रात्र गहिरी होत जाते…


-- अमोल नेरलेकर । ६ फेब्रुवारी २०१६