Wednesday 2 September 2015

स्वातंत्र्य

शनिवार, १५ ऑगस्ट. दुपारची साधारण १ वाजताची वेळ. दारावरची बेल वाजली.

सुट्टीचा दिवस असल्याने मी बर्यापैकी आळसावलेला होतो आणि त्यात आता सुस्त शरीराला १०-१२ पावलांची हालचाल करायला लागणार ह्या विचाराने चेहर्यावर आठ्या आल्याच. तसाच उठलो, दार उघडल. समोर साधारण ७० वर्षाचे आजोबा एक कुरिअर घेऊन उभे होते.

'अरुण नेरलेकर कोण इकडे? त्यांच कुरिअर आहे' अस म्हणत त्यांनी दाराच्या फटीतून ते कुरिअर आणि त्याची पावती देण्यासाठी सही करायचा असलेला कागद माझ्याकडे सरकवला. मी त्यावर सही करणार इतक्यात माझ्या मागून आवाज आला -

'या आजोबा, बसा. पाणी देऊ का? उन आहे ना बाहेर खूप. या, थोडावेळ बसा म्हणजे बर वाटेल…' बाबा त्या आजोबांशी बोलत होते.

'ते' आजोबा आत आले. बाबांनी त्यांना पाणी दिल. ते बसलेही २ मिनिट आणि नंतर बाबांना धन्यवाद देऊन निघून गेले. अवघ्या ३ ते ४ मिनिटांचा प्रसंग होता तो पण नक्कीच खूप काही विचार करायला लावणारा होता.

 नंतर जेवताना तो विषय निघाला तेव्हा बाबा मला म्हणाले -
'मगाशी आलेले आजोबा पाहिलेस? ७० वर्षांचे आहेत पण वेळ-काळ न पाहता, ऋतू कोणताही असो, त्यांना गेले अनेक महिने मी कुरिअर द्यायला येतात तेव्हा पाहतोय. त्यांच्याशी बोलतो. त्यांचही एक आयुष्य आहे. काही प्रसंग असतील, काही वेदना असतील. काही गोष्टी स्वत: आवडतात म्हणून ते करत असतील पण काही ठिकाणी त्यांचाच नाइलाज असेल म्हणूनही ते त्या करत असतील. दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी नसते आणि प्रत्येक खरी गोष्ट दिसेलच अस नाही. पण आपल्यासमोर येणार्या प्रत्येक व्यक्तीची आपण विचारपूस करायला हवी. त्याला काय हवय-नकोय ते पहायला हव.

आमच्या तरुणपणाचा काळ खरच खूप सुंदर होता. मित्र असोत वा ओफिसमधले सहकारी आणि चाळीतले शेजारी असोत वा घरातले नातेवाइक, माणसाला माणसाविषयी आस्था होती, तळमळ होती आणि माणुसकी होती. त्यावेळी आत्ताइतकी संवादाची प्रगत साधने नसतीलही कदाचित पण माणसाला माणसाविषयी असणार्या भावना सखोल होत्या आणि त्यामुळे हृदयातल हास्य आणि चेहऱ्यावरील स्मित दोन्ही एकच होते. ते दाखवायला आम्हाला कोणत्या स्माईलीज आणि इमोजी लागल्या नाहीत.

तुमचा काळ वेगळा, गरजा वेगळ्या. पर्यायाने जगाशी संपर्कही वाढला तुमचा. पण न जाणे त्या वाढणार्या माणसांच्या संख्येसोबत तुमच्या मनातील राग, द्वेष, असूया, चीड, अहंकार, स्पर्धात्मक भावना ह्या सार्या गोष्टी पण वाढायला लागल्या आहेत आणि ह्याच गोष्टी तुमच्या मूळच्या मनाला आणि त्यातील माणुसकीला पारतंत्र्यात ठेवत आहेत, नेत आहेत. माणसालाच माणसापासून दूर नेत आहेत.

आज स्वतंत्र दिन. आजच्या दिवशीच देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे पण तुमची मन न जाणे कित्येक वर्षांपासून पारतंत्रात अडकलेली आहेत. त्यांना कधी  मिळणार स्वातंत्र्य? त्यांच्या हक्कासाठी कधी होणार लढाया, मोर्चे आणि सत्याग्रह? एकदा तुमच्या मनाला त्या पारतंत्र्यातून बाहेर काढून तर बघा म्हणजे सोनेरी सूर्यकिरणात फडकणार्या त्या शुभ्र, तेजस्वी ध्वजाची शान म्हणजे नक्की काय असते हे तुम्हाला वेगळ सांगायची आवश्यकता राहणार नाही…'

बाबांच हे बोलण ऐकल्यावर मनात एक वेगळ्याच विचारांची लाट आली जिचा प्रवाह ह्या पारतंत्रात अडकलेल्या मनाला मुक्त करू पाहत होता, त्याला स्वातंत्र्यसूर्य दाखवू पाहत होता…


-- अमोल नेरलेकर । ३१ ऑगस्ट २०१५ 

No comments:

Post a Comment