Wednesday, 22 April 2015

दाटून आले..

आज पुन्हा अवकाळी नभ दाटून आले,
आज पुन्हा स्वत:वरती मन दाटून आले..

मनाने जरी अजून तरूण मी कालचा,
श्रांत चेहर्यावरती आज वय दाटून आले..

डोळ्यांत आसवांचा सागर खोल उभा,
अस्वस्थ किनार्यावरती उर दाटून आले..

असण्यावरी जरी मी, नाही केली सक्ती,
नसण्यावरी तयांच्या भय दाटून आले..

सुन्या सांजवेळी तुज चाचपडते नजर,
धूसर क्षितिजावरती रंग दाटून आले..

मैफिलीत तुझ्या जरी श्रोता मी आगळा,
समेवरी इथे अजाण सूर दाटून आले..

- अमोल नेरलेकर 

Friday, 10 April 2015

बुरखा

हा तोच का? नाही, नाही..हा तो नाही!
पण हा तोच आहे...अं हं..नाही!

चेहऱ्यावरून तरी तोच वाटतोय...पण मग अचानक आज हा बदल का जाणवतोय?
आणि बदल जाणवतोय तर मग फक्त मलाच? का त्याला पण? का सगळ्यांनाच? आणि मग जर बदल सगळ्यांनाच जाणवत असेल, तर आज काय बदलल नक्की? 'तो' का त्याच्याकडे बघायची दृष्टी?

विचार...कोडी..न उलगडणारी..

माणूस तोच असतो..अगदी रोज जसा दिसतो तसाच..फार तर फार उंची, जाडी आणि डोक्यावरील काळ्या केसांची किंबहुना केसांचीच संख्या बदलत असते फक्त...आणि आपण ज्याला सुसंकृत भाषेत 'नीटनेटके कपडे' म्हणतो..तस काहीतरी..

तुम्ही माणूस मनातून ओळखलात का हो कधी? त्याआधी स्वत:च मन तरी कधी?
आपल्या मनासारखीच बाकीची मने इथे-तिथे आपल्याला सभोवती फिरताना दिसतात... 

मुळात माणसाच्या मनाच विवस्त्र रूप खूप सालस आणि निर्मळ आहे..आपणच त्याला राग, मत्सर, अहंकार आणि तणाव ह्यांच्या बुर्ख्यांनी पार गुंडाळून टाकलय...इतक की शेवटी आपलच मन आपल्याला ओळखता येत नाही...
आज-काल अशी बुरखे घालूनच फिरणारी माणस खूप दिसतात..त्याचा फार त्रास होतो...


--अमोल नेरलेकर

Thursday, 9 April 2015

बावरी..

नाजुक इतुकी, इतुकी कोमल,
जशी बहरली रातराणी..
सांजवेळची हूरहूर ती,
ती रात पुनवेची..
स्मितरेषा त्या लपवीत चंचल,
लाजली जशी ती..
गालावरील खळी सांगते,
मी झाले तुझात बावरी.. 

Wednesday, 8 April 2015

पहाट

मला सांग आज ती सांज कोणती होती?
हीच काल तुझावर का इतुकी रुसली होती?

मनाचाच मनाशी व्यर्थ संवाद चालू होता..
उत्तरे का प्रश्नांपाशी तशीच खिळली होती?

नको काही सांगू..नको काही बोलू..
दोघान्मधली शांतताच ते सारे बोलत होती..

दरवळला दारी पुन्हा, मोहोर चैत्रातला,
सडा पारिजाताचा, ती अंगणे मुक्त होती..!

उष्ण अबोल्यानंतर चांद रात पडली होती,
आशेच्या किरणान्नीही पहाट पांघरली होती..


- अमोल नेरलेकर

Wednesday, 1 April 2015

स्वप्न

स्वप्नात निजला प्राण,
स्वप्नात सजे श्रावण…
स्वप्नात सत्य दडलेले,
स्वप्न मनात फुललेले…

स्वप्नी प्राण कोवळा,
स्वप्न विरहाचा सोहळा…
स्वप्न मावळलेली सांजवेळ,
स्वप्न प्राजक्त भाबडा…

स्वप्नी खुलले विश्व,
स्वप्नी बहरले दृष्य…
स्वप्न मोहात भुलवण,
स्वप्नी 'तुझी' आठवण…


- अमोल नेरलेकर 

Monday, 23 March 2015

पाणी..

थेंब थेंब पाण्यासाठी,
चालतो मैले किती दूर..
आज हिच नदी शुष्क,
जीस गतवर्षी आला पूर..

आधीच सुकली ही काया,
त्यात सुकलेली जमीन..
ना दोन वेळेची भाकर,
कुठे गुरां 'चारा' नवीन?

रडून थकले 'भुकेले',
'तहानलेले' मूल लहान.. 
डोळ्यांतील आसवांनी,
मी भागवतो ही 'तहान'..

--अमोल नेरलेकर

Sunday, 22 March 2015

नाती

माणसासाठी माणूस आहे ही जाणिवच खूप आधार देणारी आहे..
मुळात 'नाते' ह्याचा अर्थच आधार असा असावा ..

नाती ही परत 'असलेली' आणि 'मानलेली'…
'असलेली' नाती सक्तीची आणि पर्याय नसलेली ..त्यांचा आधार वाटला तर दुसरे सुख नाही पण जाच वाटला तर त्याहून मोठी वेदनादेखील नाही…
ह्याउलट मानलेली नाती…त्यांचा कधीच जाच वाटत नाही कारण ती मनापासून स्वीकारलेली असतात…त्यांच्यात एक आपुलकी असते…आपलेपणा असतो..विश्वास असतो..

माणसाच आयुष्य अनेक नात्यांनी फुलल आहे..प्रत्येक माणसाला आणि प्रसंगाला स्वत:चा सुवास आहे..
इथे दरवेळी गुलाब श्रेष्ठ ठरेलच अस नाही कारण फुलाचा सुवास ही तुलनेची गोष्ट नव्हे..

-- अमोल नेरलेकर